Sunday, November 29, 2009

विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
रहाटोची नये ।।१।।

चालू नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।।२।।

रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।

आदिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।।३।।

Tuesday, November 10, 2009

राजगड-दुसरा दिवस

रात्र भर ठंडी होती.पांघरुणातृन बाहेर निघताना बराच त्रास होत होता.पण इलाज नव्हता.आज पण बरच फिरायचं होतं.मस्त पैकी चहा बनवला.थोडं फार किडूक मिडुक खाऊन घेतलं आणि परत भटकंती ला सुरुवात केली.पाली दरवाजा एक ग्रुप फोटो काढून घेतला.

आज आम्हाला सुवेळा माची आणि बालेकिल्ला पहायचा होता.पटापट निघालो.वर आलो तो सूर्योदय झाला होता आणि सोनेरी प्रकाशाने बालेकिल्ला उजळला होता.बालेकिल्ल्याला जायच्या कडयातल्या पायऱ्या बघायची उत्सुकता होती आणि सुवेळा माचीताले नेढे सुद्धा.बालेकिल्ल्या कडे जाताना उजव्या हाताला सदर लागते ती मागे टाकुन बालेकिल्ल्याच्या डोंगराला भिडलो.बालेकिल्ल्याचा दरवाजा पद्मावती माचीच्या विरुद्ध बाजूला आहे.कड्याखालच्या रस्त्यावरून चालत राहिले की १५ ते २० मिनिटात आपण बालेकिल्ल्याच्या पायऱ्या आहेत तिथे पोहोचतो.या कड्यातल्या पायऱ्या चढायला खोबणी आहेत त्यांच्या आधाराने आपण महादारावाज्यात पोहोचतो.या हादारवाज्यात अफजल खानाचे मुंडके पुरले आहे आणि शिव काळात त्याची पूजा होत असे.त्या दरवाज्यात जयजयकार करत आत प्रवेश केला.उजव्या हाताला असलेल्या पायऱ्या वर चढून गेलं की उजव्या हाताला लागतं ते चंद्रतळं.राजगडावर ठिकठिकाणी पाण्याची इतकी सोय आहे की हे पाणी वर्षभर पुरते.इतके बांधकाम,तटबन्दी,बुरुज,टाकी,मंदिरे,दरवाजे,दिंड्या इतर कुठेही पाहायला मिळत नाही.तळे मागे टाकून पुढे गेलं की खाली उतरायला वाट दिसते आणि समोर दिसतो तो पद्मावती बुरुज आणि पद्मावती माची.या पद्मावती बुरुजाखाली एक गुहा आहे पण तिथे जाता येत नाही.बुरुजाखाली पहिले असता दोन्ही पाली दरवाजे,खालची वाट,समोर तोरणा आणि कानंदी नदीचे खोरे दिसते.परत मागे फिरलो आणि दक्षिण पश्चिम बुरुजापाशी पोहोचलो.इथून खाली संजीवनी माची दिसते.आणि डाव्या बाजूला सुवेळा आणि डुबा दिसतो.इथे सुद्धा काही अवशेष आणि महाराजांच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.या माथ्यावर पोहोचल्यावर स्वर्गावर स्वारी केल्यासारखे वाटते.एवढ्या उंचावर आल्यावर आजूबाजूचा एवढा थोरला परिसर दृष्टीक्षेपात येतो.४५०० हजार फुटावर आपण आहोत याचा अनुभव काही वेगळाच असतो.ह्या अनुभवाची शिदोरी घेत खाली उतरलो.आता सुवेळा माची कडे जायचं होतं.कड्यातल्या पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूने सुवेळा माची कडे जाणारा रस्ता खाली उतरतो.राजगडाच्या या तिन्ही माच्या गडाचे वैभव आहे.आणि प्रत्येक माचीचं वेगळेपण हे मनाला भावतं.सुवेळा माची कडे जाताना डाव्या हाताला खाली उतरून गुजावाने दरवजा लागतो.तिथे जायला खाली उतरावे लागते.आता हा रस्ता वाहिवटीसाठी बंद करण्यात आला आहे.तो बघून आल्यावर सुवेळा माची कडे प्रस्थान केले.औरंगजेबाचा वेढा पडला होता तेव्हा त्याने सुवेळा माची पलीकडे तोफांसाठी धमधमे बांधले होते.सुवेळा माचीत एक सुंदर अशी गणपती ची मूर्ती स्थापन केली आहे.ती अप्रतिम आहे.तिथून पुढे गेलं असता डावीकडे दृष्टीस पडतं ते उंचावर असलेलं नेढ.ह्या निसर्गनिर्मित नेढ्यात जाऊन बसण्याचा आणि परिसर न्याहाळण्याचा आनंद काही अवर्णनियच.नेढयाचा कडा संपला की लागतो तो हत्ती प्रस्तर.वेळ कमी असल्यामुळे सुवेळा माची च्या टोकापर्यंत जाता आले नाही.परत यायचं तेव्हा ते फत्ते करायचं असं ठरवूनच जड अंत:करणाने गड उतरायला सुरुवात केली.........

Saturday, November 7, 2009

राजांचा गड......राजगड

राजगड पाहायचं किती दिवसांपासून मनात होतं.तो योग एकदाचा जुळून आला.सगळी तयारी पूर्ण झाली.अगदी स्टोव्ह पासून सूप पर्यंत आणि स्वेटर पासून चप्पला पर्यंत.आम्ही एकुण १० ज.सगळे गड पहायला आसुसलेले झालो होतो.८ जण चारचाकी मधून आणि आम्ही दोघं दुचाकी वरून.पहाटे चार वाजता डोम्बिवली सोडलं.....राजगडाच्या पहिल्या दर्शनाची आतुरता मनात ठेउनच.
एक एक मकाण मागे टाकत कात्रज रोड ला लागलो.आणि लागले ते कात्रजचे बोगदे.....काय मजा आल्ये सांगू त्याच्या मधून जाताना.फोटो काढले(ते पुढे गेले कसे ते येईलच).सगळे एकत्र झालो नसरपुर फाट्याजवळ.४ ४.३० तास प्रवास करून थकलो होतो त्यामुळे नाश्ता करायचा होता.एक रस्त्यावरच बस स्टॉप होता.तिथे थांबायचं ठरलं.रस्त्याच्या कडेला एक छोटीशी पायवाट होती.ती रस्त्याच्या थोडी खाली होती.तिथे लावू असा विचार करून गाड़ी उभी करणारच होतो एवढ्यात काय झालं ते समजलंच नाही.बहुदा थकव्या मुळे तोल सांभाळता आला नाही.आणि गाड़ी सकट बाजुच्या खड्ड्यात पडलो.सुदैवाने काही लागलं नाही मला पण जे होऊ नये ते झालं.दोन गोष्टी......एक....मागचं बघायचा आरसा तुटला.....पूर्णपणे.....फ़क्त सांगाडा शिल्लक राहिला.आणि दुसरं म्हणजे पुढचा ब्रेक तुटला.आली का पंचाईत.त्यात फोटो बघत असताना चुकून सगळे डिलीट झाले.फार टेंशन आलं मला त्यावेळी.काहीच सुचत नव्हतं थोडा वेळ.पण विचार केला जे व्हायचय ते होईल.आधी एक चक्कर मारून बघितली.सगळं ठीक वाटलं. मग जरा स्थिरावलो.थोड्या वेळाने सगळे भिडू निघालो.आणि दुरवर पहिलं राजगडाचं दर्शन झालं.
या दर्शनानेच थक्क व्हायला होतं.बालेकिल्ला,सुवेळा आणि पद्मावती माच्या आणि सभोवतालचा परिसर बघून मन प्रसन्न होते.काही मिनिटात गुंजवणे ला पोहोचलो.गाड्या पार्क केल्या आणि चढायला सुरुवा केली.हा चढ़ आहे तो तुंग सारखा अंगावर येत नाही.वाटेत दोन चार वेला थांबलो.लिम्बू मिठाचा आस्वाद घेतला.पाणी प्यायलो.गप्पा गोष्टी करत आला तो पद्मावती चा चोर दरवाजा.जाताना कातळातल्या पायऱ्या लागतात.त्या चढल्यावर आपण पद्मावती माचीत प्रवेश करतो आणि जे काय वाटतं त्यावेळी ते शब्दात व्यक्त नाही करता येत.एकदम भरून येत.ज्या महाराजानी २५ वर्ष इथे घालवली तिथे येण्याचं भाग्य लाभल्याचं जे समाधान होतं त्याला तोड़ नाही.लगेच लागतो तो पद्मावती तलाव.त्याला वळसा घालत पद्मावती मंदिरात पोहोचलो.या मंदिराचं महत्त्व असं की महाराज मोहिमेला निघत तेव्हा पद्मावती देवीचं दर्शन घेत असत आणि सहकार्याना मार्गदर्शन करत असत.शनिवार असल्यामुळे देवळात चांगलीच गर्दी होती.रात्रि झोपायच कुठे हे सुद्धा ठरवायच होतं.पण इतकी भूक लागली होती की आधी तिथेच मस्त पेटपूजा केली.आणि सतरंज्या घालून ताणून दिली.अशी मेल्यासरखी झोप लागली आहे की सांगुन सोय नाही.दुपारचे ४ वाजले होते.आजचा प्लान संजीवनी माची बघायचा होता.त्यासाठी पद्मावती माची मागुन तटबंदी लगत कड्या जवलून पायवाटेने राज वाड्यापर्यंत पोहोचलो.आता फ़क्त चौथरा शिल्लक आहे.आधी इथे लोकानी कमानी पाहिल्या आहेत.तिथून पुढे लागतो तो तलाव.खास लोकांसाठी.त्याच्या पुढे उजव्या हाताला वाट जाते ती पाली दरवाज्याकडे.तिथपर्यंत जाउन दोन्ही पाली दरवाजे बघून वर आलो.आणि संजीवनी माची कड़े प्रस्थान केले.ही वाट बालेकिल्या खालून कड्या जवळून जाते.थोड्या फार चढ़ उतराची अणि थोड्या जंगलाची अशी ही वाट मजेशीर आहे.कडा ओलांडून पुढे आलं की मागे वलून पाहिल्यावर दिसतो तो बालेकिल्ल्याचा उभा कडा.तसेच पुढे चालत राहिलो.सूर्य मवालाती कड़े झुकत होता.सगळा आसमंत मंद अशा पिवाल्या रंगाने भरून गेला होता.त्या वातावरणात पुढे जात राहिलो आणि एकदम दर्शन झालं ते नागमोडी तटबंदी असलेल्या संजीवनी माचीच.थक्कच झालो आम्ही सगले.माचीच्या टोकापर्यंत पोहोचलो.समोर सूर्य मावळत होता.उजव्या बाजूला बेलाग तोरणा मागे बालेकिल्ला आणि डाव्या ताला लांब दिसणारा डूबा .स्तिमित झालो होतो सगले.आता परतायला हवं होत.रात्र पडायला सुरुवात झाली होती.तसेच एकमेकांच्या आधाराने परत आलो.आधी मुक्काम पद्मावती मंदिरात करायच ठरल पण गर्दी बघून जीव घाबरा घुबरा झाला आणि पाली दरावाज्या मागच्या पहरेकर्याच्या देवडीत मुक्काम करायचा अस ठरल.सगळ्याच्या बैग घेउन आणि मजबूत पाण्याची सोय करून देवडी गाठली.रात्रि चा बेत फ्राईड राईस होता.तो हाणला आणि गप्पा टप्पा करत झोपी गेलो.रात्रि ठंडी होती आणि पांघरून बेताचीच होती.मग एकमेकांच्या हतापयाचं पांघरू ण करून त्या तेवढ्या जागेत गच्च कोम्बुन गाढ़ झोपलो.